Tuesday, August 16, 2016

नानूचं पत्र

नानूचं पत्र माझ्या ऑफिसच्या खात्यात आलेलं बघून थोडं साशंक मनानेच त्यावर टिचकी मारली. मागच्या वर्षीच कंपनीने गुपचूप नानूला बाइज्जत दूर नेऊन सोडलं होतं. त्याच्या नशीबाने त्याला दुसर्‍या गावात लगेच नोकरी मिळालीही होती. त्यानंतर एक दोन आठवड्याने त्याचं पहिलं पत्र आलं होतं. त्यात तरी नानू आनंदी वाटला होता. त्याच्या सहकार्‍यांनी नव्या कंपनीत त्याचं चांगलं स्वागत केलं होतं. नविन मनिजरही सत्ययुगातले असावेत असे प्रेमळ मनमिळाऊ इ.इ. होते. कामही विषेश अवघड नव्हतं असं म्हणाला होता. तेव्हाच मी मनात म्हटलेलं की बाबारे, नोकरीनंतरचे पहिले काही दिवस हे लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांसारखेच गोग्गोड असतात! मग लवकरच हे 'दिवस जातात', आणि डिलीवरीची वेळ येऊन ठेपते. तेव्हा आत्ता फार हुरळून जाऊ नकोस. अर्थात शहाण्या माणसाने नानूला 'सल्ले' देण्याच्या भानगडीत पडू नये, हे मला चांगलंच माहित असल्यामुळे, त्याच्या पत्रावर "अरे वा! भलतीच मजा आहे तुझी हं! यु आर व्हेरी व्हेरी लक्की हां!" छाप उत्तर देऊन टाकलं होतं.

पण आज असं वाटतंय, की तेव्हा त्याला खरं मत सांगीतलं असतं तर बरं झालं असतं, कारण आजचं त्याचं पत्र त्याच्या प्रसूतीवेणांनीच भरलेलं होतं. या नव्या कंपनीत म्हणे दर दोन ते तीन आठवड्यांनी रीलीजेस, शिवाय आधिच्या रिलीज मधे केलेल्या चुका सुधारणे (त्या सुधारताना नविन चुका भरणे), दर रिलीज नंतर त्याचा रिपोर्ट मनिजरांना देणे, त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसल्यामुळे त्यांच्या शिव्या खाणे, यामुळे नानू पुरता नामोहरम झाला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं त्याचे सहकारीही एकेक करून सोडून चालले होते. त्यांमुळे बिचारा अगदीच हवालदिल का काय म्हणतात तसा वाटला. 

नानूला आता माहेरची आठवण होऊ लागली आहे. "कुठं काही जमतंय का बघा ना" असं म्हणून माझ्यासारख्या त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर सहकर्मचार्‍यांच्या दाढ्या कुरवाळच्याचं काम सध्या करतोय. कोणास ठाऊक कदाचीत त्याच्या पूर्वपुण्याईवर तो इथे परत येईलही. तोवर त्याच्या पुढच्या डिलीवरीसाठी शुभेच्छा देऊन पत्र बंद करावं आणि अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपल्या तारखांवर लक्ष ठेऊन असावं हे उत्तम!

No comments:

Post a Comment