Thursday, September 10, 2020

शेअर बाजार आणि मी

"अरे आज मार्केट पाहिलंस का? काय उसळलंय! व्वा !" मन्याचे शब्द कानावर पडले आणि एकदम जुनी टेप मनात सुरू झाली... 


चौथी किंवा पाचवीची उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. एके काळी आपल्याकडे उन्ह्याळ्याच्या सुट्ट्यांमध्ये "पोरांचं काय करायचं?" हा प्रश्न पालकांना आजच्याइतका भेडसावत नव्हता. पण पोरानं दुपारचं उगाच उन्हात उंडारू नये म्हणून आई पुस्तकं किंवा बैठे खेळ (ज्याला मराठीत बोर्ड गेम म्हणतात ते) घेऊन यायची. तर, त्या वर्षी तिने "नवा व्यापार" आणला होता. माझं "गणित" आणि बाबांचं "वेव्हार-ज्ञान" सुधारावं या सुप्त हेतूने तिने तो खेळ निवडला होता. अर्थात तिचे दोन्ही हेतू कधी साध्य झाले नाहीत ते सोडा! पण नवीन खेळ म्हणून उत्साहाने आम्ही पोरांनी तो खेळायला घेतला. चिरा बाजार, वरळी, नळकंपनी  वगैरे विकत घेऊ शकण्याच्या कल्पनेनेच खूप श्रीमंत झाल्याचं वाटत होतं आणि तेवढ्यात घात झाला. माझं प्यादं "व्यवहार" नावाच्या चौकोनांवर स्थिरावलं. कार्ड उचलून वाचू लागलो. "सट्टा बाजारात नुकसान! १०० रुपये भरा" ! बोंबला ! माझी सट्टा बाजाराची पहिली अधोगती इथपासूनच सुरू झाली. "बाबा सट्टा बाजार म्हणजे काय हो?" मी विचारलं, "जुगार असतो तो ! कधी खेळू नको हां" असं म्हणून बाबा त्यांच्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकिटाचा नंबर पेपरातल्या  निकालाच्या नंबराशी (शेवटापासून) पडताळून पाहू लागले. 

सट्टा बाजाराची किंवा शेअर मार्केटची अशी ओळख झाल्याने शेअर बाजारातला मत्त वृषभ व्ह्यायचा मी त्याऐवजी नुसताच बैलोबा झालो. पुढे कित्येक वर्ष सट्टा किंवा शेअर बाजार शब्द कानी पडले की शंभर रपये भरण्याचा आदेश देणारं ते व्यवहार कार्ड डोळ्यासमोर यायचं आणि हे असलं "व्यवहार" ज्ञान आम्हाला लहानपणीच मिळाल्यानं एक मराठी माणूस कोट्याधीश होता होता राहिला!

असो, पुढे दहावीच्या मार्कांनी डोळ्यासमोर काजवे चमकावल्यानंतर कॉमर्स शाखेत जाण्याचा योग आला. हो, इथे दोन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. एक म्हणजे त्या वेळी ९८, ९९, १०० हे आकडे फक्त थर्मोमीटर मध्ये ताप आल्यावर दिसायचे , किंवा कधी चुकून श्रीकांत / गावसकर चांगली ब्याटिंग करत असले तर ! ९९ टक्के , ९९.७ टक्के,  १०० टक्के, हे असले अघोरी मार्क कोणालाच पडत नव्हते. दुसरं म्हणजे जितके मार्क मिळतील ते गपगुमान देवाचं दान समजून खालमानेनं ते दान पालकांपुढे ठेवायचे. आपलं कार्ट पुढे कुठे दिवे पाजळणार आहे हे पालक ठरवायचे. सायन्सला जाण्याएवढे मार्क मिळाले नाहीत तर कॉमर्स आणि तिथेही कोणी थारा दिला नाही तर आर्ट्स अशी सरळ सरळ विभागणी होत असे. मी पहिल्यापासूनच मध्यममार्गी ! त्यामुळे गपचूप जे पाहिलं कॉलेज मला आपलं म्हणेल तिथे प्रवेश घेऊन टाकला आणि पुढच्या आयुष्याचा / करियरचा प्रश्न देवावर सोडून दिला ( ज्याने चोच दिली तोच चारा वगैरे वगैरे ). 

इथे पुन्हा हे शिंचे शेअर पुढ्यात आले. बरं आले ते आले पण परीक्षेचे प्रश्न होऊन आले. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास!  एकूणच तो "विषय सर्वथा नावडो" ला खतपाणीच मिळालं. ते प्रेफरंस शेअर , इक्विटी शेअर, डिबेंचर वगैरेंच्या जंजाळात कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी अवस्था झाली होती.  अकौंटिंग, इकोनॉमिकस, मार्केटिंग सारख्या त्रिदेवांनी ओये ओये करून विव्हळायची वेळ आणली होती. त्यांच्यावर कशीबशी मात करून परीक्षा देऊन पार पडलो तेव्हा अमरीश पुरीला माधुरी, सोनम आणि संगीता एकत्र नाचताना बघून जसा हर्षोल्हास झाला होता तस्सा चेहरा झाला होता ! 

नंतर कॉलेजचे दिवस संपून बैलाप्रमाणे काम करण्याचे दिवस आले आणि पैसे कमवायला किती ग घासावी लागते याची जाणीव झाली. काही मित्र होते जे शेर बाजाराची थोरवी सांगायचे. "अरे मी फक्त दहा हजार टाकले दोन महिन्यापूर्वी, आज त्याची किंमत पंधरा हजारावर गेलीये बोल!" बोल काय ?कप्पाळ? दहा हजार एक रकमी बघितलेही नाहीयेत अजून! 'टाकतोय' कुठून ! 'परसाकडेला पडत नाहीत' असं मी (मनात) म्हटलं!  "मी सांगतो तुला, आता पुढच्या काही महिन्यात मार्केट बघ कसं  रॉकेटसारखं वर जातंय ! दहाचे वीस होतील हां हां म्हणता ! माझं ऐक, तू पण टाकच थोडे. आत्ताच वेळ आहे. ही वेळ गेली ना तर पस्तावशील !" मित्र मला समजावत होता. "माझ्या पासबुकने कधी पाच आकडी नंबर बघितलेच नाहीत रे बाबा!" मी माझी झोळी उघडून दाखवली. "अरे यार, बडा सोचो !"  इतक्यात बिल घेऊन वेटर आला. मी त्याच्या तावडीतून वाचलो. त्याच्या म्हणजे वेटरच्या नव्हे! मित्राच्या तावडीतून, कारण त्याला अश्या वेळी महत्वाचा फोन येतो. 'दहा हजार, वीस हजार!?'  एवढे मोठे आकडे मी फक्त नाटक सिनेमांमध्येच ऐकले होते. ! काही लोकांनी अगदी लोन काढून पैसे गुंतवले होते म्हणे. ही असली जोखीम आमच्या पाच पिढ्यात कोणी घेतली नव्हती. त्या दिवशी कधी नव्हे ते उत्साहाने यासंबंधी घरी विषय काढला, तर मायबापांनी लगेच पाणी ओतलं ! "आपल्याला कतरीनाचा कितीही कैफ चढला असला तरी आपण हृतिक एवढे रोशन झालो नाही! उगाच स्टोव्हला पंप मारल्यासारखं नाचू नये" ! झालं ! माझा सगळा कैफच मावळला. आईने पोष्टाचे फॉर्म आणले होते. शेवटी आम्ही च्यायला  किसान विकास पत्र (साडेपाच वर्षात दाम दुप्पट !) आणि महाराष्ट्र ब्यांकेमध्येच ठेवणार पैसे ! 

मित्राने दावा केल्याप्रमाणे शेअर मार्केट रॉकेट प्रमाणे वर गेलं पण दिवाळीतल्या दारू संपलेल्या रॉकेट प्रमाणेच खालीही आलं. त्याच्या दहा वीस हजारांचं काय झालं कोणास ठाऊक पण बऱ्याच जणांचे हात पोळल्याचं समजलं. शेर मार्केट मधले सगळे शेर मिशी भादरल्यागत तोंड लपवू लागले. "चालायचंच रे बाबा.. शेअर बाजार म्हटला  की थोडं वर खाली चालायचंचया वेळेला मी त्यांना धीर देत होतो. ज्यांनी कर्ज घेऊन पैसे गुंतवले होते त्यांच्या तर गोळ्या कपाटात होत्या ! एकाने माझ्याचकडे थोडे पैसे मागितले. नंगा नाहाएगा क्या और निचोडेंगा क्या ? जितकी शक्य होती तेवढी मदत केली.   सुदैवाने थोड्या दिवसांनी बाजार वधारला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला .. पण त्या थोड्या दिवसांमध्ये त्याची अवस्था बघवत नव्हती. 

"काय रे कुठे हरवलास!" मन्याने पुन्हा या जगात आणलं ! "तू टाकलेस की नाही पैसे मार्केट मध्ये ?" मी नुसतंच हसलो आणि आईला स्मरून एफ डी रिन्यूचा फॉर्म भरू लागलो

- किरण मराठे

Tuesday, December 11, 2018

तो मी नव्हेच !

रोजच्या सारखं सकाळी माझं खासगी ईमेल चेकवलं आणि अर्धा ताड उडालो. (पूर्वी तीन ताड वगैरे उडवायचो पण आजकाल वजन थोडं वाढलंय) पण वजनाचं एक असो, गेले काही महिने असे इमेल वाचून उडण्याचे प्रसंग माझ्यावर वारंवार येताहेत. हा प्रकार सुरू झाला तेव्हा, प्रायव्हसीला सोन्याच्या पारड्यात तोलणाऱ्या लोकांत राहिल्यामुळे असेल कदाचित, पण भारतात लोकांना अजिबातच कशी स्वतःच्या खासगी माहितीची पर्वा नाही याचा राग येऊन मी जब्बर वैतागायचो पण आता बराच निवळलोय. काय भानगड काय आहे ? सांगतो. सगळं बैजवार सांगतो. 

सुरवात आजच्याच पत्राने करूया. तर आज मला पणजी ब्यांकेनी <पणजी म्हणजे गोव्यातली नव्हे,आयची आयची आय ब्यांक... प्रत्येक वेळी एवढं मोठं नाव लिहायचा टंकाळा.. म्हणून पणजी !> नवीन गाडी घेतल्याबद्धल (आणि त्यांच्याकडूनच गाडीसाठी कर्ज घेतल्याबद्धल) अभिनंदन करणारं पत्र पाठवलंय ! आता ह्या पणजी ब्यांकेत माझंच काय पण माझ्या पणजोबांचंही खातं नाही. मग मी गाडी घेतली कधी आणि यांच्याकडून कर्ज तरी घेतलं कधी! पण पत्रासोबत जोडलेली टोचणी (मराठीत त्याला ईमेल अटॅचमेंट म्हणतात) उघडून बघितली आणि उलगडा झाला. किरण बाबुलाल मराठे नावाच्या सद्गृहस्थाने ह्या ब्यांकेतून कर्ज घेतलं होत आणि ईमेल देताना एखादं अक्षर गाळून चुकून माझाच इमेल दिला होता. आता ह्या माणसाला मी थेट ओळखत नसलो तरी आतापर्यंत त्याबद्धल बरीच माहिती मला आहे, जी कदाचीत बाबूलाल मराठयांना सुद्धा माहित नसेल. कारण ह्याची पत्र माझ्या पत्यावर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ह्या माणसाचं पणजी ब्यांकेत खातं आहे, तो स्वतः अमरावतीला राहतो. व्यवसायाने इंजिनेर असून सरकारी कंपनीत फिरतीची नोकरी करतो. त्याचा पत्ता, प्यान नंबर, फोन नंबर सगळं काही मला माहित झालं आहे. फक्त त्याच्या आणि माझ्या नामसाधर्म्यामुळे ! 

पण माझे नाव आणि आडनाव बंधू फक्त हे एकच नाहीत. 

आता किरण नेमीदास मराठे याची ओळख करून देतो. हा तगडा, गब्रू जवान कॉलेज संपवून नुकताच नोकरीला लागला असावा आणि पोरगा आता शेटल व्हायला हवा म्हणून नेमीदासकाका त्याच्या पडले असावेत. कारण याने मराठीशादी.कॉम वर खातं उघडलं आहे. गेला आठवडाभर मला मराठीशादी मधून सात आठ मुलीच्या प्रोफाइलची पत्रं येत आहेत. <प्रोफाइल उघडून बघायला गेलं तर तो पासवर्ड मागतो जो माझ्याकडे नाही त्यामुळे मी त्या प्रोफाईली उघडून बघत नाही काळजी नसावी. पत्रामध्ये थोडक्यात ओळख असते तेवढी बघतो. प्रोफाइल उघडताना पासवर्ड लागतो हे मला कसं समजलं? हा प्रश्न सध्या आपण पार्क करून ठेऊया> या प्रोफाईलींवरचे फोटो काही प्रेक्षणीय तर काही अतिप्रेक्षणीय सदरात मोडतात. मात्र त्या-त्या फोटोच्या खाली मात्र एका ओळीत दिलेला स्व-परिचय असतो. <हा मात्र इंग्रजीत असतो बरं का ! कारण “मराठी”शादी जरी असलं तरी मराठीतून स्वतःची ओळख करून देणं म्हणजे लग्नाच्या बाजारात स्वतःचीच किंमत कमी करून घेणं आहे झालं.> हां, तर तो परिचय वाचून मात्र त्या मुली कमनीय वगैरे न वाटता दयनीय वाटतात. असो, शेवटी नेमीदासांना कोणती सून मिळते कोणास ठाऊक! 

पण एकवेळ हा इसम परवडला, पण किरण राजाराम मराठे मात्र याही पुढच्या पायरीवर आहेत. हे गृहस्थ डॉक्टर आहेत. यांच्या नावाचं पहिलं पत्र मला जेव्हा आलं तेव्हा त्याचा विषय वाचूनच मी वारायच्या बेताला आलो होतो. रत्नागिरीच्या कुठल्याश्या पॅथॉलॉजि क्लिनिक मधून ते पत्र डॉक्टरसाहेबांना आलं होतं. कोणी नगमा कुरेशी तीन महिन्याच्या गरोदर असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळा त्यात होता ! ते वाचून आधी माझ्या पोटात गोळा आला. हे असलं पत्र चुकून बायकोनी वाचलं तर लाटण्यांनी डोकं फोडेल की वरवंट्याने या काळजीने मी तांब्याभर पाणी गटागटा प्यालो. पण स्वैपाकघराचं किचन झाल्यापासून पाटा वरवंटा ह्या गोष्टी हद्दपार झाल्याचं आठवलं आणि मानवाने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीने उर भरून आला. कोणत्या गोष्टीचं कौतुक कोणाला कधी वाटेल काही सांगता येत नाही बघा ! असो तर त्या पत्राकडे वळू. आता ह्या कोकणस्थाला त्या यवनीच्या वाटेला जावंसं का वाटलं याच कुतूहल म्हणून ते पत्र उघडलं, तेव्हा श्री मराठे हे डॉ. मराठे आहेत आणि कुरेशीआपा त्यांच्या पेशंट असल्याचं कळलं. कोण कुठल्या त्या बाई पण त्या आणि त्यांचं होणारं पोर सुखरूप आहेत आणि डॉक्टरसाहेबांचा त्यात काही हात नाही (हं ! विनोद पुरे !) हे वाचून मला कित्ती बरं वाटलं म्हणून सांगू! 

असो, आता मी या प्रकाराला निर्ढावलो आहे. पत्र पाठवणाऱ्यांना “अहो, तो मी नव्हेच” असं वारंवार कळवळून सांगूनही काही फरक पडत नाहीये हे जेव्हा समजलं तेव्हा भाईकाकांना शरण गेलो. पुल म्हणून गेले आहेत ना, की “शेजारचा रेडियो ठणाणा करत असला तर ती गाणी आपल्यासाठीच लागली आहेत असं समजून ऐकावी, म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो” ; तस्मात मी आता असल्या पत्रांची आवर्जून वाट बघतो आणि एखाद्या समांतर जगात आपण कोण आणि कसे झालो असतो असा थोडा खुळचट विचार करत बसतो. 

- किरण कमलाकर मराठे

Saturday, April 21, 2018

पुस्तक वेडा (एक लघुकथा)

सुनिलला वाचनाचं फार म्हणजे फारच वेड. आठवी/नववीतल्या इतर मुलांच्या मानाने सुनिलचा व्यासंग कोणालाही थक्क करेल असाच होता. कोणतंही पुस्तक हाती आलं की ते वाचून पूर्ण केल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे, मग कुठलाही विषय असो. आई-वडिलांनाही त्याच्या वाचनाचं फार कौतुक होतं. त्याच्या सुदैवाने घरची परिस्थिती उत्तम असल्याने त्याचा कोणताही हट्ट लगेच पूर्ण होत असे.

त्याच्या घराच्या जवळच रेगेकाकांचं ग्रंथभांडार होतं. सुनिल तिथला नेहमीचाच गिऱ्हाईक. ह्या दुकानातून शेकडो पुस्तकं त्याने विकत आणून वाचली होती! (वाचनालयातली वापरलेली पुस्तकं त्याला चालत नसत.. प्रत्येक पुस्तक नवीन हवं).

आजही नेहमीप्रमाणे तो दुकानात बसून पुस्तकं चाळत होता. बहुतेक सगळीच पुस्तकं त्याने वाचलेली होती. गेल्या काही दिवसांत काही नविन वाचायलाही मिळालं नव्हत. त्यामुळे त्याला फार उदास उदास वाटत होत. शेवटी दोन एक तास झाल्यावर घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा रेगे काकांनी त्याला हटकलं, "हं मग काय घेतलंस आज ?" पण त्याचे हात रिकामेच होते. तो निराशेने म्हणाला, "आज काहीच नाही काका. नविन चांगलं काही आलंय का?" रेगेकाका क्षणभर घुटमळले. रेगेकाकांनी चष्मा काढून त्याच्या कडे बघितलं. मग म्हणाले, "एक मिनीटभर थांब." आणि दुकानाच्या मागच्या भागात लुप्त झाले. सुनिलला थेडी आशा वाटू लागली. मात्र पाचेक मिनिटं झाली तरी रेगेकाका येईनात म्हणून तो थोडा थोडा अस्वस्थ होऊ लागला. शेवटी एकदाचे काका आले.
हातात एक जाडसर पुस्तक होतं.  जरी नवं कोरं दिसत असलं तरी त्यावर साठलेली धूळ बघून ते तितकंही नवं नसावं असं सुनिलला वाटल. रेगेकाकांनी त्याचे भाव जाणून लगेच खुलासा केला, "हे पुस्तक शक्यतो कोणी घेत नाही त्यामुळे बाहेर ठेवलं नव्हतं."
सुनिलने पुस्तक हातात घेतलं, 'मृत्युचा खेळ', काळ्या लाल रंगसंगतीत लिहिलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच त्याला ते पुस्तक आवडलं. ते उघडणार इतक्यात रेगेकाकांनी घाईघाईनं ते त्याच्या हातातून जवळ जवळ खेचूनच घेतलं. सुनिलने आश्चर्याने त्यांचाकडे बघितलं. काका थोडे नर्वसच वाटले. त्याला म्हणाले, "हे पुस्तक मी तुला देईन पण एका अटीवर..."
"कसली अट?" आजवर काकांनी कधी अटी बिटी घातलेल्या नव्हत्या.
"हे पुस्तक मी तुला विकत देतो, पण ... " काका पुन्हा अडखळले, " पुस्तकाचं सर्वात पहिलं पान ज्यावर लेखकाचं नाव, प्रकाशक, आवृत्ती वगैरे लिहिलेलं असतं ना, ते मात्र तू वाचायचं नाहीस. चुकूनही नाही."
"हं!" असली विचित्र अट सुनिलने कधीच ऐकली नव्हती. पण पुस्तकातली कथा त्याला पूर्ण वाचता येणार होती. त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता त्याने ती अट मान्य केली.
"कितीला आहे हे पुस्तक?" त्याने खिशातून पाकिट काढत विचारलं.
"फक्त पाचशे रुपये, तुझ्यासाठी म्हणून फक्त तीनशे मधे देतो".... तसं पाहिलं तर ती किंमत फार वाटत होती. पण आता पुस्तक वाचण्याची उत्सुकता सुनीलला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने पाकिटातून पैसे काढून काकांच्या हातावर टेकवले, आणि सुसाट वेगाने धावत घरात आपल्या खोलीत जाउन पुस्तक वाचायला सुरूवात केली. पुस्तक उघडताना पहिलं पान उघडणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. 
...
शेवटचं पान वाचून त्याने पुस्तक मिटलं तेव्हा रात्रीचे अडिच वाजले होते. आता सुनिलचं मन त्याला स्वस्थ बसू देईना... पहिल्या पानावर एवढं काय आहे? एकिकडे नुकतीच वाचलेली भयकथा आणि दुसरीकडे पहिल्या पानावर काय आहे याचं कुतूहल... शेवटी मनाचा हिय्या करून त्याने पहिलं पान उघडलं.. त्यावरचे शब्द वाचून तो तीन ताड उडाला... ते शब्द होते
..
..
..
"किंमतः तीस रुपये"

Monday, March 20, 2017

ह्या ढकल्यांचं कराल काय?


अहं, ढकले हे कोणाचं आडनाव नाहीये. किंवा ट्रेनमधे चकलीच्या सोर्यात भाजाणी भरतात तशी माणसं भरली असली तरी 'खाली है' म्हणत बाहेरून रेटत ढकलत राहातात त्यातले पण नाहीयेत. इंग्रजीत 'फॉरवर्ड' म्हणजेच मराठीत आलेला माल पुढे ढकलणारे जे असतात ना; मी त्यांच्या बद्धल बोलतोय. आपण त्यांना ढकलपंडीत किंवा कोरडे पाषाणही म्हणू शकतो.

आता प्रथम एक कबूलीजबाब मात्र मी द्यायलाच हवा. कधी एके काळी जेव्हा ताजं ताजं गरमागरम आंतरजाल बोटांशी आलं होतं तेव्हा मी सुद्धा जवळ जवळ रोज एक ई (ऽऽऽ)-मेल मित्रांना ढकलायचो. पुढे कधीतरी ती सवय आपोआपच सुटली. कदाचीत तुम्हीही जेव्हा आतंरजालीय बालकं असाल तेव्हा हे केलं असेल.

पुढे स्मार्ट्फोनचा जमाना आला, आणि आंतरजालाचं मायाजाल फारच फोफावलं. शाळेतल्या शेंबड्या पुतण्या-भाच्यांपासून, मूळव्याधीग्रस्त काका-मामांपर्यंत सगळेच माहीतीच्या सागरात आपापली धार सोडू लागले. सकाळच्या वेळी सुविचार पाठवल्याशिवाय प्रेशर येईनासं झालं. दिवसभरात इकडून तिकडून येणारे इ-नोद, सुभाषितं, बातम्या, इशारे, माहीतीपत्रकं, मदतीची आवाहनं आणि बराच माल आयात निर्यात व्हायला लागला. नव्हे ते एक आदीम कर्तव्यच बनलं. स्वतःच्या शब्दात लिहू शकणारे तसेही फार थोडेच असतात त्यामुळे दुसर्‍यांचे शब्द उधार घेऊन... आणि बहुतेकवेळा चोरून... आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात कोणाला कसली गंमत वाटते हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे.

तर ते एक असो. ह्या ढकल्यांची वर्गवारी करायची तर ती काहीशी अशा प्रकारे होईलः

१. फोन-कोंबडेः एक वेळ सकाळी सुर्य उगवायचा नाही, पण रोज सकाळी शुभ-सकाळ / गुड-मॉर्नींग छाप संदेश, झालंच तर “सूंदर अक्षर हाच खरा दागिना!” छाप सुविचार पाठवणारे ह्वॉट्सॲपी कोंबडे मंडळी आरवले नाहीत असं होणे नाही. बहुतेक शाळेत असताना फळ्यावर सुविचार लिहीण्याचं काम यांच्याकडे असावं. सुविचार वाचून लोकं चांगली वागतील असं ज्यांना वाटतं ते लोक अजूनही शाळेतच आहेत की काय असं वाटतं. गंमत म्हणजे व्हॉट्सॅपी ग्रूपमधे या कोंबड्यांच्या आरवण्यालाही दाद देणारी लोकं असतातच.

२. परोपकारी गंपूः या प्रकारात मदतीचं आवाहन करणारी मंडळी येतात. बरं मदतीचं आवाहन ज्यांच्यासाठी आहे त्यांना आपणच काय ही लोकं सुद्धा ओळखत नाहीत. बहुतेक वेळा ही गंपू लोकं स्वतः कोणालाच मदत करत नाहीत. पण आपण सतरा ग्रूपमधे तो संदेश ढकलल्यामुळे फार मोठं समाजकार्य केल्याचं समाधान मात्र या मंडळींना वाटत असावं.

३. सदा-सावधः सावधानतेचे इशारे हौशीनं पुढे पुढे पाठवत राहाणं हे यांचं मेन काम. मग ते इशारे महाराष्ट्र पोलीसांकडून असोत वा झांबीयाच्या पोलीसांकडून. विषेशतः बायकांनी कुठे कोणती काळजी घ्यावी याबाबत हे फारच दक्ष असतात. पुन्हा जे काही इशारे असतील ते चालू काळातले असतील असंही नाही. मागच्या वर्षींचे इशारेसुद्धा अजून पुढे पुढे ढकलले जात असतात.

४. आबापापू: म्हणजेच “आली बातमी पाठव पुढे”. आजकाल ताज्या बातम्या मिळण्यासाठी ट्विटर, फेबु आणि व्हाटसॅप हे मुख्य स्रोत बनत चालले आहेत. आणि यामागे या आबापापू लोकांची बोटं आहेत. बातमी कसलीही असो, म्हणजे मध्य पूर्वेत झालेला स्फोट असो किंवा पंतप्रधानांना लागोपाट आलेल्या तीन शिंका असोत, बातमी पसरवणं महत्वाचं. अर्थात बातमी खरी आहे की खोटी असल्या फालतू शहानिशा करायला यांना वेळही नसतो आणि इंटरेस्टही.

५. अस्मितावादीः ज्या लोकांना जगण्यासाठी अन्न-पाण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या अस्मितेची गरज असते ते अस्मितावादी लोक. खरंतर असल्या लोकांचं पीक उदंड आहे. भाषिक असो वा भौगोलीक; अस्मिता नै तो कुच नै. मग अशा वेळी आपापला कंपू बनवणे आलेच. पण समानशील लोकं शोधण्यापेक्षा आपल्या विचारांशी जे सहमत होत नाहीत अशांची बदनामी करणे (आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणे) हे प्रमुख काम होऊन जातं. सगळ्यात वैताग आणणारी ही जमात आहे. सगळ्यांनी आपापले महापुरूष, आपापले सणवार वाटून घेतले आहेत. यांची अवघड जागी झालेली अस्मिता-गळवं इतकी टम्म फुगलेली की, कोणी वेगळा विचार मांडला की दुखावल्याच यांच्या भावना.

६. इनोदवीरः सगळ्यात कमी त्रासदायक प्रकार म्हणजे हे इनोदवीर. जुने विनोद नवीन नावं घालून पुढे पाठवणारे हे वीर खरं म्हणजे अगदीच काही टाकाऊ नाहीत. क्वचीत कधीतरी हाफिसात आपला मुरारबाजी झालेला असतो, अशा फोन थरथरतो, सहज लक्ष जातं आणि मित्राने अत्यंत पांचट ज्योक पाठवलेला असतो. तो वाचून क्षणभरासाठीतरी का होईना रक्तदाब कमी होऊन जातो. बरं वाटतं.

७. फेबु-मजनूः ह्या लोकांचा उपद्रव स्त्रीयांना जास्त होतो. प्रेमाचे अर्थपूर्ण संदेश ढकलणे हे यांचं मुख्य काम. रस्त्यावरच्या भुर्जीपाव किंवा चायनीस गाडीच्या बाजूला जिभल्या चाटत बसलेल्या कुत्र्यांमधे आणि या मजनूंमधे कमालीचं साम्य आहे. क्वचीत कधीतरी एखाद्या मुलीच्या प्रोफाईलवरून यांच्या एखाद्या पोस्टला लाईक आली की लग्गेच यांची लाळ गळायला लागते आणि यांचा ढकल सिलसिला चालू होतो. रस्त्यावरच्या कुत्र्यांप्रमाणेच एकदा हाडहाड केलं तर बरेचसे गप्प बसतात. पण कधीकधी एखादा पिसाळतोही. कधी कधी मुलीच्या नावाची खोटी प्रोफाईल तयार करून काही जण खडे टाकत असतात. पण गंमत म्हणजे यांच्या प्रोफाईलवर इतर मजनू येऊन सलगी करायला बघत असतात. एकूण यांच्या लीला दुरून पाहण्यात मजा आहे.

८. भक्तभाविकः ही जमात फॉरवर्ड उद्योगातली सगळ्यात प्राचीन काळापासून कार्यरत असलेली जमात आहे. म्हणजे अगदी जेव्हा कॉम्प्युटरही नव्हते तेव्हासुद्धा पोस्टाने ही मंडळी कोणत्यातरी बाबा बुआ माता देवी यांचे फोटो पाठवायचे आणि ते पुढे पाच दहा जणांना पाठवायला सांगायचे. आधुनिक काळातही तग धरून बसलेल्या ह्या मंडळींचं कार्य आता शतपटीनं सोपं झालंय. गुडगुडे बाबांच्या फोटोला पाहताक्षणीच लाईक करा आणी सात जणांना शेअर करा. असं केलंत तर एका तासात आनंदाची बातमी मिळेल. नाही तर कोणत्यातरी क्ष व्यक्तीने न वाचता डिलीट केलं आणी त्याचं कसं दिवाळं वाजलं याचा साग्रसंगीत व्रुत्तांत यात असतो. या पद्धतीचं यश इतकं की चांगली शिकलेली लोकंसुद्धा 'कशाला विषाची परीक्षा घ्या' असला विचार करून बिन्धास्त पुढे ढकलतात. याचं आणखी एक उपरूप म्हणजे कोण्या लहान मुलाला/मुलीला क्यांसर झालेला आहे तर त्या फोटोखाली आमेन लिहा. जणू वरती आकाशातला बाप फेसबूक उघडूनच बसलाय आणि दहा लाख लोकांनी आमेन लिहीलं तरच तो त्या मुलाचा जीव वाचवणारे. किंवा बिल-गेटस त्या फोटोला किती लाईक्स मिळाले ते मोजून तितके पैसे त्या मुलीला देणारे. कै च्या कै विचार करतात लोक. ह्यांना पाहिलं की ‘भगवान के नाम पे’ म्हणत भीक मागणाऱ्या भिकाऱ्याची आठवण होते. ते पैशाची भीक मागतात, हे लाईक्स ची इतकाच फरक.

९. खेळिये: या मंडळींनी एके काळी एवढा उच्छाद मांडलेला की त्यांना कंटाळून काही लोकांनी फेबु-आत्महत्या केली. सुरुवात फेबु शेतीपासून झाली. मग वांग्यांना पाणी घाल, डुकरांना खायला घाल असल्या आचरट विनंत्या हे लोकं करायचे. नंतर कोणत्यातरी फेबु-हाटेलात काम करणारे, स्वतः:ला जेम्स बॉण्ड समजणारे डिटेक्टीव्ह वगैरे झाले. आत्ता आत्ता पर्यंत गोळ्या-तोडणारे खेळ चालू होते. ही मंडळी फेबु वर त्यांचा स्वतः:चा वेळ कसा घालवतात याच्याशी काही घेणं देणं नाही; पण जेव्हा दुसऱ्यांना त्या खेळाची आग्रहपूर्वक निमंत्रण पत्रिका पाठवतात तेव्हा त्यांच्या पिढयांचा मनातल्या मनात उद्धार केल्याशिवाय राहवत नाही.

१०. शुभेच्छूक: पुर्वी दिवाळीच्या, नववर्षाच्या अश्या मोजक्याच मातबर दिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक फोन करायचे. पण आजकाल चतुर-फोन आल्यापासून संक्रान्तीपासून, संकष्टीपर्यंत सगळ्यां दिवसांच्याच्या शुभेच्छांचा खच पडत असतो. म्हणजे बहुधा लोक आपल्याला आलेले शुभेच्छासंदेशच ढकलत असतात, पण जरा कल्पना करा, जो कोणी संदेश प्रथम पाठवत असेल तो दररोज सकाळी भिंतीसमोर उभं राहून कालनिर्णय बघतोय, म्हणतो "अरे वा! आज भाद्रपद शु. चतुर्दशी का ! वा वा" आणि "ह्यापी भाद्रपद शु चतुर्दशी" असा मेसेज टायपतोय ! किती उत्साह! किती कळकळ !

तर हे ही असो. आपण सगळेच आंतरजालीय जीवजंतू. अजून काही वर्षांनी थोडे प्रगत जीव बनलो की कदाचीत याहून आणखी प्रकार वाढवू. कारण एकमेकां पास करू अवघे करू फॉरवर्ड !


/किरण मराठे

Tuesday, August 16, 2016

नानूचं पत्र

नानूचं पत्र माझ्या ऑफिसच्या खात्यात आलेलं बघून थोडं साशंक मनानेच त्यावर टिचकी मारली. मागच्या वर्षीच कंपनीने गुपचूप नानूला बाइज्जत दूर नेऊन सोडलं होतं. त्याच्या नशीबाने त्याला दुसर्‍या गावात लगेच नोकरी मिळालीही होती. त्यानंतर एक दोन आठवड्याने त्याचं पहिलं पत्र आलं होतं. त्यात तरी नानू आनंदी वाटला होता. त्याच्या सहकार्‍यांनी नव्या कंपनीत त्याचं चांगलं स्वागत केलं होतं. नविन मनिजरही सत्ययुगातले असावेत असे प्रेमळ मनमिळाऊ इ.इ. होते. कामही विषेश अवघड नव्हतं असं म्हणाला होता. तेव्हाच मी मनात म्हटलेलं की बाबारे, नोकरीनंतरचे पहिले काही दिवस हे लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांसारखेच गोग्गोड असतात! मग लवकरच हे 'दिवस जातात', आणि डिलीवरीची वेळ येऊन ठेपते. तेव्हा आत्ता फार हुरळून जाऊ नकोस. अर्थात शहाण्या माणसाने नानूला 'सल्ले' देण्याच्या भानगडीत पडू नये, हे मला चांगलंच माहित असल्यामुळे, त्याच्या पत्रावर "अरे वा! भलतीच मजा आहे तुझी हं! यु आर व्हेरी व्हेरी लक्की हां!" छाप उत्तर देऊन टाकलं होतं.

पण आज असं वाटतंय, की तेव्हा त्याला खरं मत सांगीतलं असतं तर बरं झालं असतं, कारण आजचं त्याचं पत्र त्याच्या प्रसूतीवेणांनीच भरलेलं होतं. या नव्या कंपनीत म्हणे दर दोन ते तीन आठवड्यांनी रीलीजेस, शिवाय आधिच्या रिलीज मधे केलेल्या चुका सुधारणे (त्या सुधारताना नविन चुका भरणे), दर रिलीज नंतर त्याचा रिपोर्ट मनिजरांना देणे, त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसल्यामुळे त्यांच्या शिव्या खाणे, यामुळे नानू पुरता नामोहरम झाला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं त्याचे सहकारीही एकेक करून सोडून चालले होते. त्यांमुळे बिचारा अगदीच हवालदिल का काय म्हणतात तसा वाटला. 

नानूला आता माहेरची आठवण होऊ लागली आहे. "कुठं काही जमतंय का बघा ना" असं म्हणून माझ्यासारख्या त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर सहकर्मचार्‍यांच्या दाढ्या कुरवाळच्याचं काम सध्या करतोय. कोणास ठाऊक कदाचीत त्याच्या पूर्वपुण्याईवर तो इथे परत येईलही. तोवर त्याच्या पुढच्या डिलीवरीसाठी शुभेच्छा देऊन पत्र बंद करावं आणि अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपल्या तारखांवर लक्ष ठेऊन असावं हे उत्तम!

Friday, May 6, 2016

देव आणि दगड

असं म्हणतात की परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तीशाली, सर्वगुणसंपन्न, सर्वत्र, सर्वकालीन आहे. साध्या भाषेत सांगायचं तर देवाला सगळ्ळं आधीच माहीत असतं. तो कायप्पण बनवू शकतो आणि जमिनदोस्तही करू शकतो. तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच्च करतो आणि तो कधीच्च चुकत नाही. तो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे असतो आणि तो कालपन, आजपन, उद्यापन अश्या प्रकारे सगळ्या काळात स्थिर आहे.

अर्थात हे त्याचं वर्णन वेदांमधे, पुराणांमधे किंवा बायबल , कुराणामधे केलं आहे की नाही ते माहीत नाही. पण त्याचं हे स्वरूप सर्वांनीच या ना त्या संदर्भात ऐकलंच असेल.

आता या वर्णनावरून जर देवाची कल्पना करायचा प्रयत्न केला तर या वर्णनात किती मोठे लोचे आहेत ते लगेच लक्षात येतं. एक छोटासा प्रश्नही या समजूतीला सुरूंग लाऊ शकतो.

उदा. "जर देव सर्वशक्तीशाली आहे, तर तो असा दगड बनवू शकतो का की जो तो स्वतःसुद्धा उचलू शकणार नाही?" काय द्याल याचं उत्तर? "नाही" दिलं काय आणी "हो" असं दिलं काय, दोन्ही-बाजूंनी देव सर्वशक्तीमान नाही हेच सिद्ध होत नाही काय ?

दुसरं उदाहरण, "देव पाप करू शकतो का?" जर करू शकतो तर देव परम पवित्र ठरत नाही आणि जर पाप करू शकत नसेल तर देव सगळ्ळं सगळ्ळं करू शकत नाही.

आणखी एक झोल, जर देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच असतं तर मग 'मला पास कर' किंवा 'मला मुलगा/मुलगी होऊ दे' किंवा 'मला आजारातून बरं कर' वगैरे प्रार्थना करून आपण त्याच्या परफेक्ट प्लॅन मधे ढवळाढवळ का करतो? जर परिक्षेत मी पास झालो तर मी पास होणारच होतो (प्लॅन के मुताबिक!), आणि जर नापास झालो तर ते देवाने माझ्या भल्यासाठीच केलं असणार! मग माझ्या प्रार्थनेचा काय परीणाम ? आणि समजा देवाला माझी दया आली आणि त्याने मी नापास होत असतानाही मला पास केलं (भगवान, तुमने मेरी सुन ली ??) तर मग त्याने माझं वाईट नाही का होणार? थोडक्यात एकतर देव सर्वज्ञ नाही किंवा भक्तांच्या प्रार्थनेमुळे काहीच फरक पडत नाही किंवा जे करतो ते भल्यासाठीच असं नाही!

कुछ तो गडबड है दया!

Sunday, April 17, 2016

बाग आणि माळी

राम आणी श्याम दोघे अगदी घट्ट मित्र. लहान असताना ते गावाबाहेरच्या मैदानात खेळत असत. त्यामैदानाच्या बाजूने खूप सगळी झाडं फुलाफळांनी बहरलेली होती.

खूप वर्षांनी राम आणि श्याम पुन्हा गावात आले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते दोघे त्या मैदानात गेले. त्या मैदानाच्या बाजूची झाडं आजही तशीच बहरलेली होती.

राम म्हणाला, "वाः, काय मस्त जागा आहे आजूनही. आपण इथे नसताना इतकी वर्षं कोणतातरी माळीच ह्या जागेची काळजी घेत असला पाहिजे!"

त्यांनी शोधायचा खूप वेळ प्रयत्न केला पण त्या दोघांनाही तो दिसला नाही.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी रात्री येत असेल."

श्याम म्हणाला, "आपण इथे रात्रीसाठी क्यामेरा लाऊन ठेऊ, म्हणजे तो माळी कोण ते आपल्याला कळेल"

त्याप्रमाणे त्यांनी क्यामेरा लाऊन ठेवला आणि घरी गेले.

दुसर्‍या दिवशी मोठ्या आशेने त्यांनी क्यामेरा चालू केला, पण त्या क्यामेरात झाडांशिवाय कोणाचेच चित्र नव्हते.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी अदृश्य असेल."

मग त्यांनी माळ्याला शोधायचा चंगच बांधला आणि वासावरून माग घेणारे कुत्रे आणले, पण व्यर्थ!

राम म्हणाला, "कदाचीत त्याचा वासही जाणवत नसेल."

श्याम म्हणाला, "मग आपण इथे ध्वनीलहरी पकडणारं रडार लाउन ठेऊ, त्याशिवाय ह्या बारीक तारांचं जाळं पसरून ठेऊ. त्यामुळे इथे थोडीजरी हालचाल झाली तरी आपल्याला लगेच कळेल!"

त्याप्रमाणे त्यांनी सगळी उपकरणं लाऊन ठेवली.

पण दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच पडली. रडार उपकरणाने कोणतीही हालचाल दाखवली नाही. तारांची जाळीही जशी होती तशीच!

मग राम म्हणाला, "हा माळी कदाचीत कोणत्याही प्रकारे आपण जाणून घेऊ शकत नाही. आपल्या पाचही संवेदना याचं अस्तित्व दाखवत नाहीत."

श्याम म्हणाला, "जर असं असेल तर, -असा माळी जो आपण बघू शकत नाहे, ऐकू शकत नाही, स्पर्शू शकत नाही, कोणत्याही इंद्रीयांनी त्याचं अस्तित्व मोजू शकत नाही आणि - ही झाडं निसर्गतःच वाढत आहेत, कोणी माळीच नाही! यातला फरक तो काय?"