Sunday, April 17, 2016

बाग आणि माळी

राम आणी श्याम दोघे अगदी घट्ट मित्र. लहान असताना ते गावाबाहेरच्या मैदानात खेळत असत. त्यामैदानाच्या बाजूने खूप सगळी झाडं फुलाफळांनी बहरलेली होती.

खूप वर्षांनी राम आणि श्याम पुन्हा गावात आले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते दोघे त्या मैदानात गेले. त्या मैदानाच्या बाजूची झाडं आजही तशीच बहरलेली होती.

राम म्हणाला, "वाः, काय मस्त जागा आहे आजूनही. आपण इथे नसताना इतकी वर्षं कोणतातरी माळीच ह्या जागेची काळजी घेत असला पाहिजे!"

त्यांनी शोधायचा खूप वेळ प्रयत्न केला पण त्या दोघांनाही तो दिसला नाही.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी रात्री येत असेल."

श्याम म्हणाला, "आपण इथे रात्रीसाठी क्यामेरा लाऊन ठेऊ, म्हणजे तो माळी कोण ते आपल्याला कळेल"

त्याप्रमाणे त्यांनी क्यामेरा लाऊन ठेवला आणि घरी गेले.

दुसर्‍या दिवशी मोठ्या आशेने त्यांनी क्यामेरा चालू केला, पण त्या क्यामेरात झाडांशिवाय कोणाचेच चित्र नव्हते.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी अदृश्य असेल."

मग त्यांनी माळ्याला शोधायचा चंगच बांधला आणि वासावरून माग घेणारे कुत्रे आणले, पण व्यर्थ!

राम म्हणाला, "कदाचीत त्याचा वासही जाणवत नसेल."

श्याम म्हणाला, "मग आपण इथे ध्वनीलहरी पकडणारं रडार लाउन ठेऊ, त्याशिवाय ह्या बारीक तारांचं जाळं पसरून ठेऊ. त्यामुळे इथे थोडीजरी हालचाल झाली तरी आपल्याला लगेच कळेल!"

त्याप्रमाणे त्यांनी सगळी उपकरणं लाऊन ठेवली.

पण दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच पडली. रडार उपकरणाने कोणतीही हालचाल दाखवली नाही. तारांची जाळीही जशी होती तशीच!

मग राम म्हणाला, "हा माळी कदाचीत कोणत्याही प्रकारे आपण जाणून घेऊ शकत नाही. आपल्या पाचही संवेदना याचं अस्तित्व दाखवत नाहीत."

श्याम म्हणाला, "जर असं असेल तर, -असा माळी जो आपण बघू शकत नाहे, ऐकू शकत नाही, स्पर्शू शकत नाही, कोणत्याही इंद्रीयांनी त्याचं अस्तित्व मोजू शकत नाही आणि - ही झाडं निसर्गतःच वाढत आहेत, कोणी माळीच नाही! यातला फरक तो काय?"