Monday, March 20, 2017

ह्या ढकल्यांचं कराल काय?


अहं, ढकले हे कोणाचं आडनाव नाहीये. किंवा ट्रेनमधे चकलीच्या सोर्यात भाजाणी भरतात तशी माणसं भरली असली तरी 'खाली है' म्हणत बाहेरून रेटत ढकलत राहातात त्यातले पण नाहीयेत. इंग्रजीत 'फॉरवर्ड' म्हणजेच मराठीत आलेला माल पुढे ढकलणारे जे असतात ना; मी त्यांच्या बद्धल बोलतोय. आपण त्यांना ढकलपंडीत किंवा कोरडे पाषाणही म्हणू शकतो.

आता प्रथम एक कबूलीजबाब मात्र मी द्यायलाच हवा. कधी एके काळी जेव्हा ताजं ताजं गरमागरम आंतरजाल बोटांशी आलं होतं तेव्हा मी सुद्धा जवळ जवळ रोज एक ई (ऽऽऽ)-मेल मित्रांना ढकलायचो. पुढे कधीतरी ती सवय आपोआपच सुटली. कदाचीत तुम्हीही जेव्हा आतंरजालीय बालकं असाल तेव्हा हे केलं असेल.

पुढे स्मार्ट्फोनचा जमाना आला, आणि आंतरजालाचं मायाजाल फारच फोफावलं. शाळेतल्या शेंबड्या पुतण्या-भाच्यांपासून, मूळव्याधीग्रस्त काका-मामांपर्यंत सगळेच माहीतीच्या सागरात आपापली धार सोडू लागले. सकाळच्या वेळी सुविचार पाठवल्याशिवाय प्रेशर येईनासं झालं. दिवसभरात इकडून तिकडून येणारे इ-नोद, सुभाषितं, बातम्या, इशारे, माहीतीपत्रकं, मदतीची आवाहनं आणि बराच माल आयात निर्यात व्हायला लागला. नव्हे ते एक आदीम कर्तव्यच बनलं. स्वतःच्या शब्दात लिहू शकणारे तसेही फार थोडेच असतात त्यामुळे दुसर्‍यांचे शब्द उधार घेऊन... आणि बहुतेकवेळा चोरून... आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात कोणाला कसली गंमत वाटते हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे.

तर ते एक असो. ह्या ढकल्यांची वर्गवारी करायची तर ती काहीशी अशा प्रकारे होईलः

१. फोन-कोंबडेः एक वेळ सकाळी सुर्य उगवायचा नाही, पण रोज सकाळी शुभ-सकाळ / गुड-मॉर्नींग छाप संदेश, झालंच तर “सूंदर अक्षर हाच खरा दागिना!” छाप सुविचार पाठवणारे ह्वॉट्सॲपी कोंबडे मंडळी आरवले नाहीत असं होणे नाही. बहुतेक शाळेत असताना फळ्यावर सुविचार लिहीण्याचं काम यांच्याकडे असावं. सुविचार वाचून लोकं चांगली वागतील असं ज्यांना वाटतं ते लोक अजूनही शाळेतच आहेत की काय असं वाटतं. गंमत म्हणजे व्हॉट्सॅपी ग्रूपमधे या कोंबड्यांच्या आरवण्यालाही दाद देणारी लोकं असतातच.

२. परोपकारी गंपूः या प्रकारात मदतीचं आवाहन करणारी मंडळी येतात. बरं मदतीचं आवाहन ज्यांच्यासाठी आहे त्यांना आपणच काय ही लोकं सुद्धा ओळखत नाहीत. बहुतेक वेळा ही गंपू लोकं स्वतः कोणालाच मदत करत नाहीत. पण आपण सतरा ग्रूपमधे तो संदेश ढकलल्यामुळे फार मोठं समाजकार्य केल्याचं समाधान मात्र या मंडळींना वाटत असावं.

३. सदा-सावधः सावधानतेचे इशारे हौशीनं पुढे पुढे पाठवत राहाणं हे यांचं मेन काम. मग ते इशारे महाराष्ट्र पोलीसांकडून असोत वा झांबीयाच्या पोलीसांकडून. विषेशतः बायकांनी कुठे कोणती काळजी घ्यावी याबाबत हे फारच दक्ष असतात. पुन्हा जे काही इशारे असतील ते चालू काळातले असतील असंही नाही. मागच्या वर्षींचे इशारेसुद्धा अजून पुढे पुढे ढकलले जात असतात.

४. आबापापू: म्हणजेच “आली बातमी पाठव पुढे”. आजकाल ताज्या बातम्या मिळण्यासाठी ट्विटर, फेबु आणि व्हाटसॅप हे मुख्य स्रोत बनत चालले आहेत. आणि यामागे या आबापापू लोकांची बोटं आहेत. बातमी कसलीही असो, म्हणजे मध्य पूर्वेत झालेला स्फोट असो किंवा पंतप्रधानांना लागोपाट आलेल्या तीन शिंका असोत, बातमी पसरवणं महत्वाचं. अर्थात बातमी खरी आहे की खोटी असल्या फालतू शहानिशा करायला यांना वेळही नसतो आणि इंटरेस्टही.

५. अस्मितावादीः ज्या लोकांना जगण्यासाठी अन्न-पाण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या अस्मितेची गरज असते ते अस्मितावादी लोक. खरंतर असल्या लोकांचं पीक उदंड आहे. भाषिक असो वा भौगोलीक; अस्मिता नै तो कुच नै. मग अशा वेळी आपापला कंपू बनवणे आलेच. पण समानशील लोकं शोधण्यापेक्षा आपल्या विचारांशी जे सहमत होत नाहीत अशांची बदनामी करणे (आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणे) हे प्रमुख काम होऊन जातं. सगळ्यात वैताग आणणारी ही जमात आहे. सगळ्यांनी आपापले महापुरूष, आपापले सणवार वाटून घेतले आहेत. यांची अवघड जागी झालेली अस्मिता-गळवं इतकी टम्म फुगलेली की, कोणी वेगळा विचार मांडला की दुखावल्याच यांच्या भावना.

६. इनोदवीरः सगळ्यात कमी त्रासदायक प्रकार म्हणजे हे इनोदवीर. जुने विनोद नवीन नावं घालून पुढे पाठवणारे हे वीर खरं म्हणजे अगदीच काही टाकाऊ नाहीत. क्वचीत कधीतरी हाफिसात आपला मुरारबाजी झालेला असतो, अशा फोन थरथरतो, सहज लक्ष जातं आणि मित्राने अत्यंत पांचट ज्योक पाठवलेला असतो. तो वाचून क्षणभरासाठीतरी का होईना रक्तदाब कमी होऊन जातो. बरं वाटतं.

७. फेबु-मजनूः ह्या लोकांचा उपद्रव स्त्रीयांना जास्त होतो. प्रेमाचे अर्थपूर्ण संदेश ढकलणे हे यांचं मुख्य काम. रस्त्यावरच्या भुर्जीपाव किंवा चायनीस गाडीच्या बाजूला जिभल्या चाटत बसलेल्या कुत्र्यांमधे आणि या मजनूंमधे कमालीचं साम्य आहे. क्वचीत कधीतरी एखाद्या मुलीच्या प्रोफाईलवरून यांच्या एखाद्या पोस्टला लाईक आली की लग्गेच यांची लाळ गळायला लागते आणि यांचा ढकल सिलसिला चालू होतो. रस्त्यावरच्या कुत्र्यांप्रमाणेच एकदा हाडहाड केलं तर बरेचसे गप्प बसतात. पण कधीकधी एखादा पिसाळतोही. कधी कधी मुलीच्या नावाची खोटी प्रोफाईल तयार करून काही जण खडे टाकत असतात. पण गंमत म्हणजे यांच्या प्रोफाईलवर इतर मजनू येऊन सलगी करायला बघत असतात. एकूण यांच्या लीला दुरून पाहण्यात मजा आहे.

८. भक्तभाविकः ही जमात फॉरवर्ड उद्योगातली सगळ्यात प्राचीन काळापासून कार्यरत असलेली जमात आहे. म्हणजे अगदी जेव्हा कॉम्प्युटरही नव्हते तेव्हासुद्धा पोस्टाने ही मंडळी कोणत्यातरी बाबा बुआ माता देवी यांचे फोटो पाठवायचे आणि ते पुढे पाच दहा जणांना पाठवायला सांगायचे. आधुनिक काळातही तग धरून बसलेल्या ह्या मंडळींचं कार्य आता शतपटीनं सोपं झालंय. गुडगुडे बाबांच्या फोटोला पाहताक्षणीच लाईक करा आणी सात जणांना शेअर करा. असं केलंत तर एका तासात आनंदाची बातमी मिळेल. नाही तर कोणत्यातरी क्ष व्यक्तीने न वाचता डिलीट केलं आणी त्याचं कसं दिवाळं वाजलं याचा साग्रसंगीत व्रुत्तांत यात असतो. या पद्धतीचं यश इतकं की चांगली शिकलेली लोकंसुद्धा 'कशाला विषाची परीक्षा घ्या' असला विचार करून बिन्धास्त पुढे ढकलतात. याचं आणखी एक उपरूप म्हणजे कोण्या लहान मुलाला/मुलीला क्यांसर झालेला आहे तर त्या फोटोखाली आमेन लिहा. जणू वरती आकाशातला बाप फेसबूक उघडूनच बसलाय आणि दहा लाख लोकांनी आमेन लिहीलं तरच तो त्या मुलाचा जीव वाचवणारे. किंवा बिल-गेटस त्या फोटोला किती लाईक्स मिळाले ते मोजून तितके पैसे त्या मुलीला देणारे. कै च्या कै विचार करतात लोक. ह्यांना पाहिलं की ‘भगवान के नाम पे’ म्हणत भीक मागणाऱ्या भिकाऱ्याची आठवण होते. ते पैशाची भीक मागतात, हे लाईक्स ची इतकाच फरक.

९. खेळिये: या मंडळींनी एके काळी एवढा उच्छाद मांडलेला की त्यांना कंटाळून काही लोकांनी फेबु-आत्महत्या केली. सुरुवात फेबु शेतीपासून झाली. मग वांग्यांना पाणी घाल, डुकरांना खायला घाल असल्या आचरट विनंत्या हे लोकं करायचे. नंतर कोणत्यातरी फेबु-हाटेलात काम करणारे, स्वतः:ला जेम्स बॉण्ड समजणारे डिटेक्टीव्ह वगैरे झाले. आत्ता आत्ता पर्यंत गोळ्या-तोडणारे खेळ चालू होते. ही मंडळी फेबु वर त्यांचा स्वतः:चा वेळ कसा घालवतात याच्याशी काही घेणं देणं नाही; पण जेव्हा दुसऱ्यांना त्या खेळाची आग्रहपूर्वक निमंत्रण पत्रिका पाठवतात तेव्हा त्यांच्या पिढयांचा मनातल्या मनात उद्धार केल्याशिवाय राहवत नाही.

१०. शुभेच्छूक: पुर्वी दिवाळीच्या, नववर्षाच्या अश्या मोजक्याच मातबर दिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक फोन करायचे. पण आजकाल चतुर-फोन आल्यापासून संक्रान्तीपासून, संकष्टीपर्यंत सगळ्यां दिवसांच्याच्या शुभेच्छांचा खच पडत असतो. म्हणजे बहुधा लोक आपल्याला आलेले शुभेच्छासंदेशच ढकलत असतात, पण जरा कल्पना करा, जो कोणी संदेश प्रथम पाठवत असेल तो दररोज सकाळी भिंतीसमोर उभं राहून कालनिर्णय बघतोय, म्हणतो "अरे वा! आज भाद्रपद शु. चतुर्दशी का ! वा वा" आणि "ह्यापी भाद्रपद शु चतुर्दशी" असा मेसेज टायपतोय ! किती उत्साह! किती कळकळ !

तर हे ही असो. आपण सगळेच आंतरजालीय जीवजंतू. अजून काही वर्षांनी थोडे प्रगत जीव बनलो की कदाचीत याहून आणखी प्रकार वाढवू. कारण एकमेकां पास करू अवघे करू फॉरवर्ड !


/किरण मराठे

Tuesday, August 16, 2016

नानूचं पत्र

नानूचं पत्र माझ्या ऑफिसच्या खात्यात आलेलं बघून थोडं साशंक मनानेच त्यावर टिचकी मारली. मागच्या वर्षीच कंपनीने गुपचूप नानूला बाइज्जत दूर नेऊन सोडलं होतं. त्याच्या नशीबाने त्याला दुसर्‍या गावात लगेच नोकरी मिळालीही होती. त्यानंतर एक दोन आठवड्याने त्याचं पहिलं पत्र आलं होतं. त्यात तरी नानू आनंदी वाटला होता. त्याच्या सहकार्‍यांनी नव्या कंपनीत त्याचं चांगलं स्वागत केलं होतं. नविन मनिजरही सत्ययुगातले असावेत असे प्रेमळ मनमिळाऊ इ.इ. होते. कामही विषेश अवघड नव्हतं असं म्हणाला होता. तेव्हाच मी मनात म्हटलेलं की बाबारे, नोकरीनंतरचे पहिले काही दिवस हे लग्नानंतरच्या पहिल्या दिवसांसारखेच गोग्गोड असतात! मग लवकरच हे 'दिवस जातात', आणि डिलीवरीची वेळ येऊन ठेपते. तेव्हा आत्ता फार हुरळून जाऊ नकोस. अर्थात शहाण्या माणसाने नानूला 'सल्ले' देण्याच्या भानगडीत पडू नये, हे मला चांगलंच माहित असल्यामुळे, त्याच्या पत्रावर "अरे वा! भलतीच मजा आहे तुझी हं! यु आर व्हेरी व्हेरी लक्की हां!" छाप उत्तर देऊन टाकलं होतं.

पण आज असं वाटतंय, की तेव्हा त्याला खरं मत सांगीतलं असतं तर बरं झालं असतं, कारण आजचं त्याचं पत्र त्याच्या प्रसूतीवेणांनीच भरलेलं होतं. या नव्या कंपनीत म्हणे दर दोन ते तीन आठवड्यांनी रीलीजेस, शिवाय आधिच्या रिलीज मधे केलेल्या चुका सुधारणे (त्या सुधारताना नविन चुका भरणे), दर रिलीज नंतर त्याचा रिपोर्ट मनिजरांना देणे, त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नसल्यामुळे त्यांच्या शिव्या खाणे, यामुळे नानू पुरता नामोहरम झाला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं त्याचे सहकारीही एकेक करून सोडून चालले होते. त्यांमुळे बिचारा अगदीच हवालदिल का काय म्हणतात तसा वाटला. 

नानूला आता माहेरची आठवण होऊ लागली आहे. "कुठं काही जमतंय का बघा ना" असं म्हणून माझ्यासारख्या त्याच्या बरोबर काम केलेल्या इतर सहकर्मचार्‍यांच्या दाढ्या कुरवाळच्याचं काम सध्या करतोय. कोणास ठाऊक कदाचीत त्याच्या पूर्वपुण्याईवर तो इथे परत येईलही. तोवर त्याच्या पुढच्या डिलीवरीसाठी शुभेच्छा देऊन पत्र बंद करावं आणि अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपल्या तारखांवर लक्ष ठेऊन असावं हे उत्तम!

Friday, May 6, 2016

देव आणि दगड

असं म्हणतात की परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तीशाली, सर्वगुणसंपन्न, सर्वत्र, सर्वकालीन आहे. साध्या भाषेत सांगायचं तर देवाला सगळ्ळं आधीच माहीत असतं. तो कायप्पण बनवू शकतो आणि जमिनदोस्तही करू शकतो. तो जे काही करतो ते चांगल्यासाठीच्च करतो आणि तो कधीच्च चुकत नाही. तो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे असतो आणि तो कालपन, आजपन, उद्यापन अश्या प्रकारे सगळ्या काळात स्थिर आहे.

अर्थात हे त्याचं वर्णन वेदांमधे, पुराणांमधे किंवा बायबल , कुराणामधे केलं आहे की नाही ते माहीत नाही. पण त्याचं हे स्वरूप सर्वांनीच या ना त्या संदर्भात ऐकलंच असेल.

आता या वर्णनावरून जर देवाची कल्पना करायचा प्रयत्न केला तर या वर्णनात किती मोठे लोचे आहेत ते लगेच लक्षात येतं. एक छोटासा प्रश्नही या समजूतीला सुरूंग लाऊ शकतो.

उदा. "जर देव सर्वशक्तीशाली आहे, तर तो असा दगड बनवू शकतो का की जो तो स्वतःसुद्धा उचलू शकणार नाही?" काय द्याल याचं उत्तर? "नाही" दिलं काय आणी "हो" असं दिलं काय, दोन्ही-बाजूंनी देव सर्वशक्तीमान नाही हेच सिद्ध होत नाही काय ?

दुसरं उदाहरण, "देव पाप करू शकतो का?" जर करू शकतो तर देव परम पवित्र ठरत नाही आणि जर पाप करू शकत नसेल तर देव सगळ्ळं सगळ्ळं करू शकत नाही.

आणखी एक झोल, जर देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच असतं तर मग 'मला पास कर' किंवा 'मला मुलगा/मुलगी होऊ दे' किंवा 'मला आजारातून बरं कर' वगैरे प्रार्थना करून आपण त्याच्या परफेक्ट प्लॅन मधे ढवळाढवळ का करतो? जर परिक्षेत मी पास झालो तर मी पास होणारच होतो (प्लॅन के मुताबिक!), आणि जर नापास झालो तर ते देवाने माझ्या भल्यासाठीच केलं असणार! मग माझ्या प्रार्थनेचा काय परीणाम ? आणि समजा देवाला माझी दया आली आणि त्याने मी नापास होत असतानाही मला पास केलं (भगवान, तुमने मेरी सुन ली ??) तर मग त्याने माझं वाईट नाही का होणार? थोडक्यात एकतर देव सर्वज्ञ नाही किंवा भक्तांच्या प्रार्थनेमुळे काहीच फरक पडत नाही किंवा जे करतो ते भल्यासाठीच असं नाही!

कुछ तो गडबड है दया!

Sunday, April 17, 2016

बाग आणि माळी

राम आणी श्याम दोघे अगदी घट्ट मित्र. लहान असताना ते गावाबाहेरच्या मैदानात खेळत असत. त्यामैदानाच्या बाजूने खूप सगळी झाडं फुलाफळांनी बहरलेली होती.

खूप वर्षांनी राम आणि श्याम पुन्हा गावात आले. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते दोघे त्या मैदानात गेले. त्या मैदानाच्या बाजूची झाडं आजही तशीच बहरलेली होती.

राम म्हणाला, "वाः, काय मस्त जागा आहे आजूनही. आपण इथे नसताना इतकी वर्षं कोणतातरी माळीच ह्या जागेची काळजी घेत असला पाहिजे!"

त्यांनी शोधायचा खूप वेळ प्रयत्न केला पण त्या दोघांनाही तो दिसला नाही.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी रात्री येत असेल."

श्याम म्हणाला, "आपण इथे रात्रीसाठी क्यामेरा लाऊन ठेऊ, म्हणजे तो माळी कोण ते आपल्याला कळेल"

त्याप्रमाणे त्यांनी क्यामेरा लाऊन ठेवला आणि घरी गेले.

दुसर्‍या दिवशी मोठ्या आशेने त्यांनी क्यामेरा चालू केला, पण त्या क्यामेरात झाडांशिवाय कोणाचेच चित्र नव्हते.

राम म्हणाला, "कदाचीत तो माळी अदृश्य असेल."

मग त्यांनी माळ्याला शोधायचा चंगच बांधला आणि वासावरून माग घेणारे कुत्रे आणले, पण व्यर्थ!

राम म्हणाला, "कदाचीत त्याचा वासही जाणवत नसेल."

श्याम म्हणाला, "मग आपण इथे ध्वनीलहरी पकडणारं रडार लाउन ठेऊ, त्याशिवाय ह्या बारीक तारांचं जाळं पसरून ठेऊ. त्यामुळे इथे थोडीजरी हालचाल झाली तरी आपल्याला लगेच कळेल!"

त्याप्रमाणे त्यांनी सगळी उपकरणं लाऊन ठेवली.

पण दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांच्या पदरी निराशाच पडली. रडार उपकरणाने कोणतीही हालचाल दाखवली नाही. तारांची जाळीही जशी होती तशीच!

मग राम म्हणाला, "हा माळी कदाचीत कोणत्याही प्रकारे आपण जाणून घेऊ शकत नाही. आपल्या पाचही संवेदना याचं अस्तित्व दाखवत नाहीत."

श्याम म्हणाला, "जर असं असेल तर, -असा माळी जो आपण बघू शकत नाहे, ऐकू शकत नाही, स्पर्शू शकत नाही, कोणत्याही इंद्रीयांनी त्याचं अस्तित्व मोजू शकत नाही आणि - ही झाडं निसर्गतःच वाढत आहेत, कोणी माळीच नाही! यातला फरक तो काय?"

Thursday, January 14, 2016

नानूची गच्छंती !

पुलंच्या नानू सरंजामेचा नान् सरंजामे कसा झाला ते तुम्हाला माहित असेलच. नानूचे रंगेबिरंगी चाळे दिवसेंदिवस वाढतच होते, आणि एक दिवस कंबरेखाली दुखतंय का असा प्रश्न पडला आणि आठवलं की मंगळदासशेट्नी ढुंगणावर लाथ मारून हाकलून लावलं आहे. तसंच काहीसं आमच्या नानूचंही झालं.
मागच्या महिन्यातली गोष्ट. नाताळच्या सुट्ट्या थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक जण खुषीत होता. ऑफिसमधे मात्र नानू वाकडा चेहरा घेउन बसला होता. पण लगेच कसं विचारणार म्ह्णून मग सकाळची थोडी कामं आटपून झाल्यावर मी सहजच त्याला छेडलं, "काय नानू, क्रिसमसच्या सुट्ट्यांमधे काय बेत?", नानूला एवढी फुंकरसुद्धा खूप होती. दिवाळीच्या फटाक्यांप्रमाणे त्याची वात सुरसूरली आणि नानू सुरू झाला, "अरे मला दुसरा जॉब बघायला सांगीतलाय! सगळे साले फुल्या-फुल्या-फुल्या! आमच्याच टीमने कान फुंकले असणार!" वगैरे वगैरे बराच वेळ तो बोलत होता. मी त्याला काय समजावणार? इथे कोणाचीच नोकरी सुरक्षीत नाही, मग तो नानू असो, मी असो किंवा आमचा साहेब असो.
पण ही वेळ नानूवर आज ना उद्या येणारच होती. गेल्या काही महिन्यांत त्याच्या टिममधल्या इतर लोकांबरोबर त्याचे वारंवार खटके उडत होते. कारण बहुधा नानूचं विचीत्र वागणं आणि नको तिथे नको ते बोलणं हेच असायचं. कष्टमरला कसा रिपोर्ट हवा तेही नानू ठरवायला लागला आणी त्याला समजावण्यातच बाकीच्यांचा जास्त वेळ जाउ लागला. आमच्या साहेबानी त्याला सौम्य शब्दात जाणिव करून दिली पण नानू सौम्य वगैरे शब्दांनी बधणार्‍यांपैकी नव्हताच. शेवटी मग साहेबानी त्याला दुसरी नोकरी शोधण्याचा सल्ला वजा इशारा दिला.
दोन दिवसांनी नानू रिकामं खोकं घेऊन आला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. नानूने त्याचं चंबू गबाळं त्या रिकाम्या खोक्यात कोंबायला सुरूवात केली. त्याबद्धल विचारल्यावर लांबच्या एका गावात त्याला तात्पुरती नोकरी मिळाल्याचं त्याने मला सांगीतलं. मलाही त्याचं बरं वाटलं. पण त्याचं असं तडकाफडकी जाणं कोणालाच बरोबर वाटलं नाही. दोन-तीन वर्षांत त्याने केलेल्या कामाचं हस्तांतरण न करताच त्याच दिवशी दुपारी नानबाने ऑफिस सोडलं.
आता त्याची खुर्ची रिकामीच आहे. पुलंच्या नानूचा नान् सरंजामे झाला. मोठा समाजसुधारक म्हणून त्याची ओळख अन्नपूर्णाबाईंनी करून दिली तर पेपरात फोटोही छापून आले. कोणास ठाऊक कदाचीत आमचा नानोबाही नान् सरंजामे होऊन परत येईल. त्याची ओळख करून देण्यासाठी या पोष्टींचा नक्की उपयोग होईल.

Friday, November 13, 2015

हवाई नानू

नाही नाही, नानूचा आणि श्रीदेवीच्या हवाहवाई चा काही संबंध नाही, आणि नानू क्रिसमसला सुट्टीवर हवाईलाही जात नाहिये. मामला वेगळाच आहे. 
नोव्हेंबरचा महिना वेगवेगळ्या कारणासाठी महत्वाचा महिना ठरतो. आपली दिवाळी याच महिन्यात असते किंवा नुकतीच होउन गेली असते.  काही (पुरूष) मंडळी दाढी-मिशा वाढवून (नो-शेव नोव्हेंबर) प्रोस्टेट कॅंसर बद्धल जनजागृती करत असतात. (या नो-शेव नोव्हेंबरला सपोर्ट म्हणून या वेळी दिवाळीला आम्ही पण शेव केली नाही, फक्त चकल्या केल्या). पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थॅंक्सगिव्हींग आणि त्याच्या दुसर्‍यादिवशी असणारा समस्तांस आवडणारा ब्लॅक-फ्रायडे. ब्लॅक-फ्रायडे म्हणजे गिर्‍हाईकांची पर्वणीच. सगळ्या दुकानांमधून भरपूर सेल लागलेले असतात. कुठल्या दुकानातून काय आणायचं याच्या याद्या बनवून तय्यार असतात. पहाटेपासून किंवा रात्रीपासूनच काही दुकानांच्या बाहेर रांगा लाऊन हौशी मंडळी बसलेली असतात .. वगैरे वगैरे. मला असल्या लोकांबद्धल प्रचंड आदर असला तरी सुट्टीच्या दिवशी पहाटे उठून कोणी अर्ध्या भावात तूरडाळ जरी दिली तरी मी जाणार नाही.
माझ्यासारख्या आळशीमाणसांसाठीच इंटरनेटचा शोध लागला आहे त्यामुळे इंटरनेटवर कुठे काय सेल आहे ते बघत लंचटाईम मधे बसलो होतो. मागून पाठीवर नानूची पेटंट थाप पडली. "काय बेत आहे? काय काय घेणारेस येत्या ब्लॅक-फ्रायडेला?" त्यानं विचारलं. "बघतोय नुसतं. काही ठरवलं नाहीये. तू सांग, तूझा काय प्लॅन?". नानू याच प्रश्नाची वाट बघत होता. बर्‍याच लोकांना ही एक सवय असते, गेल्या सुट्टीत कायकाय मजा केली हे त्यांना सांगायचं असतं.पण कोणी विचारल्याशिवाय कसं सांगणार? मग ते दुसर्‍याला विचारतात "काय केलं सुट्टीत?"; बहुतेक वेळेला दुसरा माणून प्रतिप्रश्न करतोच आणी मग त्यांना साग्रसंगीत सुट्टीचा वृतांत देता येतो. नानू अशा लोकांपैकीच एक. त्यामुळे मी त्याला विचारताच त्याचे डोळे चमकले. खुर्चीचा पुढा माझ्याकडे वळवत त्याने सुरवात केली.
"मला गो-प्रो क्यामेरा घ्यायचाय". आता हा गो-प्रो क्यामेरा उंच डोंगरांवरून बर्फावरून घसरणारी, किंवा सायकल / मोटारसायकलवरून गडगडणारी वगैरे मंडळी त्यांचा उपद्व्याप टिपण्यासाठी करतात हे मला माहीत होतं. पण खुर्चीतल्या खुर्चीत बसणारा नानू याचा काय उपयोग करणार हे मला समजेना! माझा चेहरा प्रश्नार्थक झाला असावा, कारण नानूने लगेच खुलासा सुरू केला. "अरे मी ते ड्रोन क्वाडकॉप्टर पण घेणारे" ... अरे देवा! गेल्याच आठवड्यातल्या काही बातम्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्या.   कोणीतरी त्या रिमोटवर चालणार्‍या द्रोणाला क्यामेरा अडकवून शेजारपाजार्‍यांच्या भिंतीवरून डोकावून बघायचा प्रयत्न केला. पण शेजारी महा-रागीट! त्याने बंदुकीने सरळ त्या द्रोणाला गोळी घातली... आणि मग त्यांनी एकमेकांवर दावा केला...ई.ई. आता हे नानू महोदय पण असलंच काही करणार की काय? मी आपल्या त्याला मित्रत्वाचा सल्ला दिलाय की बाबारे, असलं काही करून नकोस. पण नानूचे पंख छाटणे अवघड आहे. आगे क्या होगा खुदा जाने!

Friday, October 23, 2015

नानू के कारनामे

आपल्याकडे गणपती आणि नवरात्रात जिलेबी-बाई, मुन्नी, शी शी शी शीला आणि आजची लेटेष्ट शांताबाई (शेळके नव्हे) वगैरेंना निरोप देऊन झाले की दिवाळीचे वेध लागतात आणि इथे लोकांना हॉलोवीनचे. आमच्या ऑफिसमधे बर्‍याच लोकांनी आपल्या 'अंदरके हैवानको' जागा करून भिंतींवर वगैरे टांगलं होतं.  भुताखेतांचं एवढं काय आकर्षण आहे कोणास ठाऊक पण या काळात जळीस्थळी चेहरे रंगवलेले किंवा मुखवटे चढवलेले पुतळे आणि भोपळ्याला खरवडून त्याच्यावर केलेली "कलाकुसर" जागोजागी पाहायला मिळते.

तर, ऑफिसला येउन खुर्चीवर टेकतो न टेकतो तोच नानूने पहिला बॉल टाकला, "आपण हॉलोवीन डेकोरेशनसाठी काय करायचं?". मागच्या वेळचा अनुभव ताजा असल्याने, त्याचं मी ऐकलंच नाही असं भासवून माझ्या कानपूटरचा कान पिळून चालू करायला लागलो. पण एकवेळ शिवाजी महाराजांची आग्राहून सहज सुटका होईल, पण या नानूच्या तावडीतून सुटका नाही. माझ्या खांद्यावर थोपटून त्याने त्याच्या प्रश्न पुन्हा केला. वास्तविक गोरंपान गुळगुळीत टक्कल, काळी-पांढरी छोटेखानी बोकडदाढी, साडेपाच फूट उंच आणी साडेचार फूट रूंद असला नानू साक्षात टीमरूम मधे असताना वेगळं डेकोरेशन कशाला असा विचार मनात आला. पण जिभेच्या टोकावर आलेले ते शब्द निर्धाराने गिळत मी क्षीणपणे त्यालाच म्हटलं "तूच सांग बाबा". नानू उत्साहाने त्याच्या टेबलावर गेला आणि दोन पोती उचलून घेऊन आला. त्यात लेगोचे लहान लहान असंख्य तुकडे भरले होते. "माझ्याकडच्या हॉलोवीनच्या लेगो भांडारातले थोडे तुकडे आणलेत. आपण त्यातून काहीतरी बनवू शकतो." हे एवढे थोडे ! हा माणूस लेगोचे तुकडे नाष्टा म्हणून दुधात घालून खातो की काय?  काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाला लेगोमधे इंटरेस्ट आहे हे मीच त्याला बोललो होतो ! पण त्याचा आज पश्चात्ताप करावा लागेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. माझ्या मुलाचा सुद्धा लेगोमधला इंटरेस्ट संपून आता मिडल-स्कूल च्या नावाखाली नवे नवे इंटरेस्ट वाढीला लागलेत. पण नानबा मात्र तिथेच अडकलाय.

त्याच्या उत्साहावर पाणी टाकावं असं मात्र मला वाटेना. "लंचटाईम मधे करुया हां." असं त्याला सांगीतल्यावर खूष होऊन तो त्याच्या टेबलाकडे वळला. खरं म्हणजे मला स्वतःला त्या तुकड्यांसोबत खेळण्यामधे काडीचाही इंटरेस्ट नाही. एक तर त्याला खूप वेळ लागतो. जो तुकडा हवाय तो कधीच सापडत नाही. मग उगाच आणखी त्रागा होतो. माझा मुलगा जेव्हा लेगोचं काहीतरी बनवूया म्ह्णून पाठी लागायचा तेव्हा "थोड्यावेळाने ... माझा चहा पिऊन झाल्यावर येतो बरंका, तोपर्यंत तू सुरूवात कर हां" म्हणून मी त्याची बोळवण करायचो. तेवढ्या वेळात तो स्वतःच लेगोचं जे काही असेल ते बनवून संपवायचा (म्हणजे त्याचं संपेस्तोवर मी चहा पिण्यात वेळ घालवायचो). आत्ता तीच श्ट्रेटेजी नानूलापण लागू पडेल का?  

वेताळा, वाचव रे बाबा.